Thursday, October 02, 2008
नसतेस घरी तू जेव्हा
जीवनाचे विरती घागे,संसार फाटका होतो
सलीलचे हे शब्द व स्वर काळजाला एकदम भिडतात.
आपली प्रिया आपल्या जवळ नाही तेव्हा कस वाटत हे शब्दात सांगण तस अवघडच!
पण संदिप-सलील ने हि भावना शब्दात व स्वरात ज्या प्रकारे व्यक्त केली आहे त्याला तोड नाही.
ती जवळ असते तेव्हा घराला एक वेगळ व्यक्तिमत्व असत. घरातल्या प्रत्येक वस्तूला तिच्या असण्याच भान असत. आँफिस मधून घरी आल्यावर एकत्र चहा पिताना चहाला पण वेगळाच स्वाद असतो.
दिवसभर झालेली वणवण घरात येता क्षणी संपलेली असते.
सकाळीआँफिसची वेळ साधताना होणारी लगबग,घाई गर्दी पळापळ घरातील वातावरण चैतन्यमयी करुन टाकते. सुट्टीच्या दिवशी दोघांनी मिळून पार पाडलेली आठवद्याची कामे,चहा पीता पीता निंवांतपणे वाचलेला पेपर किंवा मग फालतू कारणा वरून झालेले वादविवाद,भांडणे,रुसवे फूगवे!
ह्या सगळ्यातील मजा काय आहे ते कळण्यासाठी तीच नसण मह्त्वाच असत! ती असताना तीच असण कस जाणवणार कारण आपण ते प्रत्यक्ष अनुभवत असतो. ते असताना दिवस कधी उगवतो व कधी संपतो ते कळतच नाही.दिवसभर तीच अस्तित्व आपल्या भोवती भोवती घुटमळत असत. अगदी पायात पायात येणारया मांजरी सारख! दिवस्भर ती प्रत्यक्ष आपल्या बरोबर नसली तरी संध्याकाळी ती भेटणारच असते त्यामुळे तेव्हा देखील तीच अस्तित्व आपल्या भोवतीच असत.
हे अस तीच असण इतक सवयीच होत कि ते मग गृहितच धरल जात. श्वासा सारख होत. सतत जवळ असणार, त्याच्याशिवाय जगू न शकणार!
मग जेव्हा ती खरोखर लांब जाते तेव्हा मग तिच्या असण्याच महत्व जाणवत.
"नभ भांडून वीज पडावी,कल्लोळ तसा ऒढवतो
ही धरा दिशाहीन होते,अन चंद्र पोरका होतो
हे अचानक कोसळलेल संकट आपल्याला दिशाहीन करून टाकत अगदी पोरक करून टाकत.घरातल्या सगळ्या वस्तूवर सजीव व निर्जीव ,मरगळ पसरुन रहाते.सकाळच कोवळ उन खर तर नेहमी उत्साहीत करत पण आज तस नसत.
"येतात उन्हे दाराशी,हिरमूसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा,तव गंधावाचून जातो.
आता तिच अस्तितवच जवळपास नसल्यामूळे फक्त त्या अस्तितवाच्या आठवणीच असतात.श्वासच थांबल्या सारख होत.
" तव मिठीत विरघळणारया,मज स्मरती लाघव वेळा
श्वासाविन -हदय अडावे,मी तसाच अगतिक होतो
तिच नसण फक्त मलाच नाही तर आख्या घराला जाणवत असत. सगळ घरच उदासवाण झालेल असत.
देवासमोरची समई जी नेहमी आनंददायी शांततेत असते ती देखील उदासवाणी शांत असते.
"तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास,माझ्यासह मिणमिण तूटतो."
तिच अस अस्तित्व जाणवण्यासाठी वयाची अट नाही. ते कधीही जाणवत. तरल तारुण्यात,सजग प्रौढत्वात किंवा मग मुरलेल्या वार्धक्यात!
"ना अजून झालो मोठा,ना स्वतंत्र अजूनी झालो
तूज वाचून उमगत जावे,तूज वाचून जन्मच अडतो"
वयाची अट नाही पण हे जाणवण्यासाठी एक अट मात्र आहे
तिच्यावर उत्कटतेने प्रेम करण्याची.
Tuesday, January 08, 2008
उद्या देखील मी आनंदीच असेन!
जेव्हा दिवस होईल छोटा व गारठा असेल बोचरा
तेव्हा मग माझ्या हूळहूळणाऱ्या नाकाच्या शेंड्यानिशी
स्वत:ला उबदार कपड्यात लपेटून असेन मग्न माझ्या कामात
मला माहीत आहे मी आनंदीच असेन तेव्हांही
कारण तेंव्हा सूर्य मला त्याची थोडीशी,उबदार किरणे
नक्कीच उधार देईल,मला किंचित उबदार करायला
मला हे देखील माहीत आहे कि आता फक्त काही अंतरावर
आहे माझा आनंद,मग मी असेनच ना मनस्वी
त्या सब वे मधल्या आनंदयात्री गिटार वादकासारखी.
उद्या मी आनंदी असेनच
जरी आजची ही सकाळ जमून आली असली तरी
जी माझा आजचा दिवस देखील जमवून आणणार असली तरी!
आता जरी हिमकणांनी अंगण भरल असल तरी,
हिरवळी वरचे दवबिंदू मला अनवाणी फिरण्याचे आमंत्रण देत असले तरी,
या गारठ्यात ओव्हन मधल्या ब्लू बेरी मफिन्स खुणावत असल्या तरी,
ह्या शांत समाधिस्त क्षणांची शांतता चिरंतन वाटली तरी,
आता या क्षणी सगळच अगदी मस्त जमून आल असल तरी,
माझा आनंद मी थोडासा पुढे ढकलणार आहे,उद्यापर्यंत!
मला माहीत आहे कि उजाडणारा प्रत्येक दिवस
कालच्या दिवसावर आलेले किंचितसे झाकोळ
दूर करतच असतो.
आजच्या पेक्षा येणारा उद्या मला अजूनी प्रफुल्लीत करणार आहे.
काल पर्यत पडलेल्या गहन प्रश्नांची उत्तर मला "उद्या"च देणार आहे
म्हणूनच मी उद्या देखील आनंदीच होणार आहे.
(मूळ कवीता Happy Tomarrow -सई केसकर लिंक-http://www.saeekeskar.blogspot.com/)
Saturday, December 15, 2007
दिवाळखोरी शब्दांची!
पंचशब्दातील पंचमहाभूतं
बघतात आता त्या अभागी कवीला
कवितांची दिवाळखोरी जाहीर करताना
शब्दांची दिवाळखोरी जाहीर करताना,
आपल्या वाचकांची माफी मागताना
त्याचे ते अनेक लाडके शब्द
अचानक कूठे गायब झाले?
आता अंतःकरणातील वेदना
मंद झाल्या आहेत
अधीर मनातील शब्द्स्त्रोत
मूर्छीत झाले आहेत
आता आहेत फ़क्त वेदनामय रात्री
व निद्रीस्त दिवस
सतत साथ करणारे लाडके शब्द
आता गेले आहेत दूर निघून
पूर्वी शब्दामधे जागा असायच्या
आता जागांच्यामधे कधीतरी शब्द
त्याच्या कवितांना आता
सामोरं जाव लागत
एका अनाहत शांततेला
(सई केसकर यांच्या Bankrupt Poet या कवितेचा स्वैर अनूवाद. Orignal poem :Link-http://saeekeskar.blogspot.com/)
Tuesday, December 04, 2007
स्वांतंत्र्याच बंधन
अगदी स्वांतंत्र्याची देखील! कींमत देउनच घ्याव लागत ते!
किंमंत दिल्यावर ते नुसत मिळ्तच नाही तर चिकटून बसत आपल्याला
आपल्याशी भुणभूण करत.
कधी कधी भर वाऱ्यात बाईक वरून सुसाट जाताना,
आदळत आपल्याच अंगावर वाऱ्याचा झोत होऊन
कधी उमटत पाहूण्यांसाठी अंथरलेल्या ठेवणीतल्या गालीचावर
छोट्या पिल्लाच्या चि्खललेल्या पाउल खूणातून
कधी अचानक दिसत ते,अस्वथ खळाळणाऱ्या लाटा
समर्थपणे झेलणाऱ्या खंबीर पूलावर
रात्रीची रेशीम दूलई गुंडाळू्न स्वच्छ सूर्यप्रकाशातून जाताना
ते अवचित येत आपल्यासमोर
पावसाच्या टपोऱ्या थेंबात किंवा हिमकणांच्या वर्षावात
पण ते मी गर्वाने मिरवते
त्या मुळेच मी मागे फिरत नाही कुठ्ल्याही काटेरी वाटेवरून,
ते मला बांधून ठेवतं अशा अवघड वाटेवर.
माझ्या एकटेपणाचा आनंद व स्वतंत्रपणाची भावना,
क्षणातच संपते,कारण माझ्याबरोबर माझ स्वातंत्र्य
असतच ना एखाद्या लोढण्यासारख!
(मुळ कविता Freedom? सई केसकर Link-http://saeekeskar.blogspot.com/)
Monday, November 12, 2007
जीवना्ची लय
निरागस हळूवार
नुकत्याच पडलेल्या दवबिंदूंच्या,
जे वाहून जाण्यास ठाम नाकारतात,
व लहानग्याच्या हट्टासारखे पानाफूलावर बसून रहातात.
किंवा मग ऎटदार,फूगीर,कट्यावरच्या मनिमाऊच्या
जी तृणदवांनी भिजलेले आपले गुलाबी तळ्वे,
झूपकेदार मिशातून अलगद बाहेर आलेल्या इवल्याश्या जिभेने चाटता चाटता बघत असते
तुमच्या डोळ्यातील अनावर कूतूहल
तिच्या गर्द हिरव्या पाचूदार डोळ्यांनी.
किंवा मग बागेत नकळत फुलणाऱ्या फूलांनी,
नकळत वेधलेले तूमचे लक्ष
आणि मग फुलावरील दवबिंदू आपल्या ओंजळीत घेण्याची उत्स्फूर्तता दाटून आलेली.
कधी कधी कूणीतरी हळूच आपल्या नकळत
आपल्यासाठी ठेवलेल्या चाँकलेट्सची.
तर कधी मेल मधून पाठवलेल्या आपल्या आवडत्या गाण्याची ज्यामुळे मग हात नकळत वळतात तीच धून प्रामाणिकपणे वाजवण्यासाठी आपल्या गिटारकडे.
त्तर कधी मैत्रीचे क्षण साठवणाऱ्या एकांती शांततेचे
जीवनाच्या या गाण्यातील लयबध्दता राखतात
याच छोट्या छोट्या आठवणी.
(सई च्या हारमनी या कवितेच मुक्त भाषांतर . मुळ कवितेची लिंक http://saeekeskar.blogspot.com/)
Saturday, October 06, 2007
शब्दे विण संवादू
मनाचा गुंता किती गुंतागूंतीचा असतो ना? अशा गूंत्यातून शब्दांचे शेले विणण खर तर खूपच अवघड काम आहे.
लेखक कवी,विचारवंत,ज्ञानी लोकांनी हे काम उत्तम प्रकारे केले आहे.तरी देखील मला अस नेहमी वाटत की खरोखर मनाचा गुंता पूर्णपणे व्यक्त करण्याची क्षमता शब्दात नसते.मनाचा गुंता अफाट,मनस्वि ,अगम्य असतो.बऱ्याच वेळा शब्दांना हार मानावी लागते,लाचारी पत्करावी लागते. आणि जे शब्दात व्यक्त झाल अस आपल्याला वाटत ते तरी किती व्यक्त झालेल असत?
प्रेम,माया,ममता,मैत्री ह्या सु्खद भावना तसेच द्वेष,मत्सर,असुया,शत्रूत्व अशा विकारी भावना जशा आपण अनुभवतो तशाच्या तशा शब्दात कूठ मांडू शकतो? कळत नकळतच्या वयातला त्याच्या व तिच्या नजरा मधून चालणारा संवाद येइल शब्दात मांडता? एखाद्या उदा्सवाण्या संध्याकाळी एकटेच असताना शिवरंजनीचे आर्त पिळ्वटून टाकणारे सूर ऎकल्यावर मनाची जी अवस्था होते ती तशीच्या तशी येइल का मांडता शब्दात?
म्हणू्नच काही वेळा ग्रेस,आरती प्रभू,पु.शि.रेगे सारख्या कवींच्या रचना कळल्या सारख्या व न कळल्यासारख्या देखील वाटतात, अँब्स्ट्रँक्ट फाँर्म मधली चित्र मनाला काही वेळा भावतात पण नक्की काय आहेत हे समजत नाहीत. शा्स्त्रीय संगीतातील काही सुध्दा कळत नसताना एखादी तान,सुरावट मनाला हूरहूर लावून जाते.
जीएंच रमलखूणा,पावलो कोहेलोच अलकेमीस्ट, खानोलकराच कोंडूरा वाचल्या वर अनेक प्रश्नांच मनात काहूर उठत. आपल्या मनातील भावनांच्या आवेगाला वाट करुन दिल्याशिवाय मनुष्य प्राण्याला चैन पडत नाही.कदाचीत माणसाच्या याच प्रयत्नातून विविध कलांचा जन्म झाला असावा, लेखक,कवी आपल्या भावना शब्दातून मांडण्याचा प्रयत्न करतो. डोंगर दऱ्यातील अनाहत शांतता खर तर अनूभवावीच लागते पण गूलजार सारखा प्रतिभावंत कवी त्याच्या दिल ढूडंता है... या गाण्यात म्हणून जातो "इन बर्फीली सर्दियोमें किसी भी पहाड पर वादी में गुंजती हूई खामोशीया सुने" बेळगावच्या के,बी. कुलकर्णींसारखा प्रतिभावंत चित्रकार चित्रातील प्रकाश योजनेतू्नच भावनांचा अनोखा कँनव्हास कागदावर मांडून जातो.विलायतखांसाहेबांच्या सतारी वर वाजवलेले सांजगिरीचे स्वर आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जातात. भरत नाट्यम मधील पदन्यास व भावमुद्रांमधून व्यक्त होणारे भाव कित्येक वेळा शब्दापलीकडले असतात.
हे सगळ पाहील्यावर ज्ञानदेवांच्या "शब्दे विण संवादू" चा अर्थ थोडासा का होईना कळतो
Monday, July 30, 2007
डिझायर टू डाय
रविवार दिनांक २९ जुलै. दुपारी ४-४॥ सुमारास मोबाईलची रिंग वाजली.नंबर परिचीत नव्ह्ता.गेले काही दिवस साधारणत: याच वेळी टेली मार्केटींगवाल्यांचे फोन येत होते त्या मुळे हा देखील तसलाच कुठ्ला तरी फोन असणार अशा समजूतीने जरा नाराजीनेच फोन उचलला.
"केसकर का? मी बँकेतून देव बोलतोय. एस.आर.गेले"
"आम्ही लगेचच त्यांना घेउन निघत आहोत.तुम्ही ताबड्तोब या"
काही क्षण मला काहीच सुचेना. एस.आर. माझा स्कूल मेट. १९६७ मधे मी पाचवीत व एस.आर.ने सहावीत सातारा सैनिक स्कूल मधे प्रवेश घेतला. तो १९७३ मधे तर मी १९७४ मधे पास आउट झालो. त्यानंतर अचानक १९९६ साली मी व्यवसायानिमित्त आमचे खाते ज्या बँकेत उघडले त्याच बँकेत तो नोकरीस होता.तिथे आमची पुन्हा ओळ्ख झाली. गेली अकरा वर्ष मात्र कामाच्या निमित्तने आमच्या नियमित गाठीभेटी होत होत्या. एस.आर.ने काही महिन्यापूर्वी बँकेतून स्वेच्छा निवॄती घेतली होती. डायबेटीस मुळे त्याला गेले वर्ष दीड वर्ष त्रास होत होता. डोळ्यात दोष आला होता. नीट दिसत नव्ह्त. किडनी खराब झाल्यामुळे आठवडयातून दोनवेळा डायालिसिस करावे लागत होते. गेल्या वर्ष भरात पैसा देखील पाण्यासारखा खर्च झाला होता.
अलीकडे त्याची भेट फारशी होत नसे.कधी तरी त्याच्या घरी गेलो तरच भेट व्हायची.हल्ली तो मानसिक दृष्ट्या खचला होता. बहुदा आपण लवकरच जाणार आहोत हे त्याला आतून कळालेल होत. पंध्ररा दिवसापूर्वीच आमची भेट बँकेतच झाली होती.पण तेव्हा हे सगळ एवढ्या लवकर घडेल अशी कल्पना नव्ह्ती.हे अस कधी तरी ऐकाव लागणार अस वाटतच होत. ऐकाव लागणार व ऐकणे यात शेवटी फरक असतोच ना! मी व वसुधा लगेचच निघालो. त्याच्या घ्ररी खूप गर्दी झाली होती. त्याच्या पार्थिवा शेजारी त्याचा मुलगा संकेत निशब्द बसुन होता. संकेतच वय जेमतेम २४ असेल. छोटी सायली आक्रोश करत होती.वसुधा वहिनींच सांत्वन करायला आत गेली.
या सगळ्यांना सोडून एस.आर. कायमचा निघून गेला. ज्या वेळी कुटूंबाला एका भक्कम आधाराची गरज होती नेमक्या त्याच वेळी आधार तूटला. मला एस.आर.ला ओरडून विचारावस वाटत होत "काय अधिकार होता रे तूला आत्ता जाण्याचा?"
एस.आर.ला डायबेटीस होता पण त्याने कधी काळजी घेतलीच नाही. खाण्यावर कधी नियंत्रण ठेवलेच नाही. सैनिक स्कूल मधे शिकून देखील व्यायामाचे मह्त्व कधी पटवून घेतलेच नाही.डोळे बिघडले,किडनी खराब झाली तरी पथ्य पाळली नाहीत. हे सगळ माहीत असल्यामुळे अस वाटत कि तो गेला ते एका अर्थी बर झाल. आत्ता त्याला कमी हाल सोसावे लागले. कालांतराने तो अगदीच गलीतगात्र झाला असता व मग स्वत:चे व कुटूंबाचे हाल झाले असते.
आमचे अण्णा नेहमी सांगत असतात माणसा मधे सह्सा जगण्याबद्दल आसक्ती असते तर काही जणात मरणा बद्दल आसक्ती आसते. पहिली डिझाय़र टू लिव्ह -पाँझिटीव्ह तर दुसरी डिझाय़र टू डाय-निगेटीव्ह.एस.आर. मधे बहूदा मरणाबद्दल आसक्ती जास्त असावी.
Desire to die was very strong!
ईश्वर त्याच्या आत्म्यास सद्ग्ती देवो!
